पुणे : ‘पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून, सध्याचा ढासळता समतोल लक्षात घेता जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याच्या संवर्धनाची आवश्यकता आहे,’ असे मत गोयल गंगा फाउंडेशनच्या विश्वस्त गीता गोयल यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोयल गंगा फाउंडेशनतर्फे गंगा लेजंड बावधन आणि गंगाधाम टॉवर्सजवळील परिसरात स्वच्छता, सुशोभीकरण आणि वृक्षारोपणाच्या उपक्रमास सुरुवात झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, ‘पर्यावरण आणि त्याच्या संरक्षणाप्रतीची आपली जबाबदारी प्रत्येकाने ओळखल्यास पर्यावरणासोबतच आपणा सर्वांचेही जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे अत्यावश्यक आहे. आपण केवळ आपल्या कुटुंबाचा विचार न करता भावी पिढीसाठी सामाजिक योगदान म्हणून पर्यावरण समतोलासाठी प्रयत्नांची स्वत:पासून सुरुवात करावी.’
गंगा लेजंड बावधन आणि गंगाधाम टॉवर्स या दोन्ही प्रकल्पांच्या ठिकाणी या उपक्रमांतर्गत येत्या वर्षभरात पाच हजारांहून अधिक झाडे लावली जाणार असल्याचे फाउंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल यांनी सांगितले.
या प्रसंगी नगरसेवक किरण दगडे पाटील, संबंधित प्रकल्पाच्या तांत्रिक विभागात काम करणारे निखील अत्रे, कुमार बर्डे, एस. के. मिश्रा, प्रदीप सोहनी, विकास गारडे, अंकित गोयल, उद्य पाटील आदी उपस्थित होते.